Showing posts with label कविता. Show all posts
Showing posts with label कविता. Show all posts

पालकांनो,...


प्रेमाचं पांघरूण घाला
पण, दृष्टीचं काढा..
अळीचा कोष
अळीनेच फोडावा
प्रेमापोटी, मदत म्हणून
दुसर्‍या कोणी फोडला
तर...
आतलं फुलपाखरू उडायचं नाही!

जहाज बंदरावर सर्वाधिक सुरक्षीत असतं.
मात्र कायम बंदरामध्येच
नांगरून ठेवण्यासाठी
ते बांधलेलं नसतं.
उधाणलेल्या समुद्रात
वादळाशी झुंजण्यातच
त्याची खरी सार्थकता असते.

शाळेत सोडण्यापासून,
प्रोजेक्ट करण्यापर्यंत
मुलगा/मुलगी शोधण्यापासून
पुढं, त्यांची मुलं सांभाळण्यापर्यंत
मुलांच्या सगळ्याच लढाया
आपणच लढू नये.

चटके बसल्याशिवाय
अपमान पचविल्याशिवाय
वाढ अपुरीच राहते.
आयत्या सुखाला किंमत नसते.
स्वकष्टाचीच भाकरी गोड लागते.

शिक्षण द्या, संस्कार द्या...
अडचणीला आधार द्या.
पण आयुष्यभर मुलं बसून खातील
इतकं मागे ठेऊ नका.
अती प्रेम पंगू बनविते
खूप पाणी रोप कुजविते.

या कवितेतील दुसरे 'अख्खे' कडवे माझे आहे (जे एका इंग्रजी वचनावरून बेतलेले आहे). उर्वरीत कविता ही जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेच्या प्रगती-पुस्तकावरून ढापलेली आहे.